top of page

औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे - भाग दोन


औरंगाबाद जिल्ह्यातील दुर्लक्षित अशी पर्यटन स्थळे - भाग दोन

डॉ. रमेश सूर्यवंशी

अभ्यासिका, कन्नड

औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड पासून तहसीलदार पर्यंत चाळीसगाव पासून तर सोयगाव पर्यंत या परिसरात जो डोंगर पसरला आहे त्याला स्थानिक लोक अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. या डोंगरात अनेक पर्यटन स्थळे विखुरलेली आहेत. अनेक किल्ले, अनेक लेण्या, अनेक धबधबे आणि जैवविविधता असलेलं गौताळा ऑट्रम् घाट अभयारण्य. या लेखमालिकेच्या किंवा ब्लॉगच्या पहिल्या भागात आपण पाटणादेवी,जैन लेण्या , कान्हेरगड, केदा-या धबधबा, धवलतिथऀ धबधबा, पितळखोरा लेण्या, मद्रासी बाबा, चिध्या देव हे स्थानकऺ पाहिलीत. या लेख मालिकेचा दहा दुसरा भाग.

आपण पर्यटनाच्या दृष्टीने कन्नड थांबला आहात असं गृहीत धरून पर्यटनाला सुरुवात करू. आपण पाटणादेवी वरून पितळखोरा या पुरातन लेण्या पाहिल्यात.ज्यांना वर चढून जाणं आणि या पुरातन पितळखोरा लेण्या पाहणं शक्य नाही त्यांना कन्नड होऊन कालीमठ व पुढे कालीमठा पासून पितळखोरा दहा किलोमीटर असही जाता येते. मात्र वरून खाली पायऱ्या उतरून जावे लागते अर्थात पायऱ्या रेलिंग सुख कारक आहेत. अशा पद्धतीने दोन ठिकाणचा पर्यटन कालीमठ आणि पितळखोरा हे करणे शक्य होईल. कन्नड पासून पितळखोरा वीस किलोमीटर आहे तर कालीमठ हे दहा किलोमीटर वर अर्ध्या वाटेत आहे. जर वरून आपण पितळखोरा पाहत असाल तर पितळखोरा अभयारण्याच्या गेट लगत उजव्या बाजूला जाणारी वाट हे या अभयारण्यातली पाटणादेवी व्ह्यू पॉइंटला नेते. हा पॉईंट सुद्धा प्रेक्षणीय आहे खूप उंचावरून आपणाला खालील पाटणादेवी परिसर दाट झाडी दिसते. या पॉईंटचा आनंद मात्र पाटणादेवी करून वर चढून पितळखोरा पाहणाऱ्यांना घेता येणार नाही एक तर मग त्यांना वर पूर्ण चढून यावं लागेल आणि इकडच्या वाटेने कन्नड परताव लागेल.


`

लेण्यावरून गेलेला जुन्या काळातला मार्ग, एकूण 13 लेण्या त्या लेण्यातील मूर्ती हा रंगकाम आणि प्रत्येक लेणीचे वर्णन हे स्वतंत्र लेखात दिल्यामुळे येथे ते टाळले आहे. या लेण्या हत्तीच्या रांगेवर उभ्या असलेल्या लहान दरवाजा आजूबाजूला द्वारपाल द्वारपाला लागून असलेल्या नाग, पावसाचे पाणी नहाराद्वारे आणून बाहेर जाण्याची व्यवस्था, वर असलेले रंगीत खांब, त्या खांबावरील रंगीत चित्रे, भिंतीवरील रंगीत चित्रे हे सार , अभ्यासण्या जोग आणि प्रेक्षणीय आहे.










पितळखोरा पाहून कालीमठ परतत असताना अर्ध्या वाटेत तुम्हाला दक्षिणेकडे जाणारी अंबाला ठाकरवाडी ची वाट दिसेल. थोडा आत गेल्यानंतर अंबाला ठाकरवाडी लागते येथे सगळे आदिवासी ठाकर लोक राहतात त्यांच्या कामड नाच हा परंपरागत नाच. स्त्रियांचा विशिष्ट पोशाख असतो. राहत्या घराची बांधणी विशिष्ट प्रकारची, डोंगर उताराला वस्ती असली तरी दगड रचून घरापूर्ती जागा पायरीवजा सपाट केलेली असते. मग त्यावर गुरडोर बांधण्यासाठी स्वतः राहण्यासाठी सप्पर बाऺधले जाते. आदिवासींची बोली संस्कृती भाषा यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा गाव चांगला. आपण थोडे पुढे गेलात की मग कालीमठ हे भव्य मंदिर लागते अर्थात हे नव्याने बांधकाम झालेले मंदिर.




पितळखोरा पाहून आल्यानंतर आपणाला दहा किलोमीटर अंतरावर कालीमठ हे भव्य मंदिर पाहता येईल. कन्नड वरून चाळीसगाव धुळे जाणारा महामार्गावर कन्नड पासून दहा किलोमीटर अंतरावर कालीमठ फाटा लागतो या फाट्यापासून साधारणता एक किलोमीटर अंतरावर स्वामी प्रणवानऺद स्वामी यांनी उभारलेलं कालीमठ हे स्थान आहे. स्वामी प्रणवानंद सरस्वती हे कलकत्त्याच्या सुखी कुटुंबात जन्माला आलेले त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1941 चा. अभियंताचे शिक्षण घेतलेले वैभव सोडून ते घराबाहेर पडले भारत भ्रमण करीत ते दहा सप्टेंबर 1968 गणेशपुरी तालुका भिवंडी व तेथून ते पाटणादेवी तालुका चाळीसगाव येथे आलेत पाटणादेवी परिसरात गणितज्ञ ज्योतिष पारंगत भास्कराचार्य यांच्या या भूमीत, चंडिका देवीच्या भव्य मंदिर परिसरात त्यांनी 19 वर्षे तपश्चर्या केली. पुढे त्यांनी याच परिसरातील आंबा उपळा या गावी हे कालीमातेचे मंदिर उभारलं मंदिर 11 एप्रिल 1987 रोजी सुरुवात करून एकशे विस दिवसातकाम पूर्ण केलं. मंदिराची उंची 91 फूट आहे. मंदिराच्या बांधकामात नऊ हा आकडा महत्त्वाचा आहे ओटा नऊ फूट उंचीचा, कॉलम हे नऊ बाय 18 चे, प्रतीक्षिणामार्ग हा नऊ फूट रुंदीचा , गाभारा हा अठरा बाय अठरा चा, तर सभा मंडप हा 36 बाय 36 फुटाचा, कळसाची संख्या ही सुद्धा नऊ अशीच आहे. या मुख्य मंदिराच्या पाठीमागे स्वामी प्रणवानंद यांची समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.या परिसरात मोठी अशी आमराई आहे. बांधकाम करताना 85 आंब्याची झाडे वाचविण्याचा प्रयत्न झालेला आहे. हा परिसर या स्वामींनी सुशोभित केला आहे . डोंगराळ आदिवासी भागात शाळा, पोस्ट, बँक, मुलांसाठी वसतिगृह, भक्तनिवास , महाराष्ट्र बँकेची शाखा हे सारं सारं या परिसरात आणलं. नेहमी भाविकांची वर्दळ या ठिकाणी असते.





काली मधून कन्नड परतत असताना वाटेवर तुम्हाला अंबाडी धरण लागते या धरणाला अलीकडे आप्पासाहेब नागतकर जलाशय असं नामकरण करण्यात आला आहे. रस्ते आणि धरण या परिसरात ज्यांनी उभारले आणि हा परिसर सुजलाम सुफलाम केला असे ते आप्पासाहेब नागरकर यांचे नाव या जलाशयाला देण्यात आला आहे. पर्यटकांना हा जलाशय जलाशयाच्या भिंतीवरून पुढे जाऊन पाहता येईल. या जलाशयाच्या भिंतीलगत सामाजिक वनीकरणाची नर्सरी सुद्धा आहे ती सुद्धा पाहण्यासारखी आहे बाजूला धरणाच्या सांडीतून येणारे पाणी वाहणारी नदी आणि या नर्सरीत असलेले वेगवेगळे पक्षी फुलझाडे पाहण्यासारखे आहेत नर्सरी सुशोभित केलेली आहे. विशेष म्हणजे या नर्सरीतील उंच उंच झाडांवर खूप अशी वटवाघळलं ठरलेली दिसतात जी इतर तर आपल्याला दुर्मिळ वाटतात. आपल्या पर्यटनात हा जलाशय त्याच्या पायथ्याशी असलेली नर्सरी निश्चितच मनाला आनंद देऊन जाईल. या जलाशयावर आणि या नर्सरीमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहली जात असतात.





हा फेरफटका मारल्यानंतर जेवणाची वेळ होते आपण कन्नड पोहोचता जेवण करून आपण गौताळा ऑट्रम् घाट वन्यजीव अभयारण्याचा आनंद लुटण्यासाठी निघू या. गवताळ परिसर तसा पाटणादेवी पासून इकडे किशोर केले अंतुरपर्यंत पसरला असला तरी गवताळ म्हणून पर्यटकांना माहीत असलेला हा मध्यवर्ती गौताळाचा परिसर. या परिसराकडे कन्नड शहरातून जात असताना जो रस्ता लागतो तो हिवरखेडा रस्ता म्हणून ओळखला जातो कारण तो हिवरखेडा या गावाला जातो. तो गौताळ्याला जातो म्हणून त्याला गौताळा रस्ता असेही म्हणतात. हा रस्ता पुढे खाली नागद आणि रामपूरवाडी ही जातो. ज्या गावाला तो रस्ता जातो त्या गावाच्या नावाने रस्ता ओळखला जाण्याची ही पद्धत. कन्नड पासून गौताळा अभयारण्याचं गेट हे पाच किलोमीटर अंतरावर आहे. वाटेत तुम्हाला हिवरखेडा हे गाव लागते. या गवताळ्याच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी बसलेले असतात. तुमची तुमच्या वाहनांची नोंद केली जाते. गौताळा वन्यजीव अभयारण्य हे जैविक विविधतेने नटलेल असं हे अभयारण्य.





या जंगलातील या परिसरातील गवता अट्टमघट वन्यजीव अभयारण्य म्हणून राज्य शासनाने 1986 साली सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषणा केली. 25 /10/ 1997 रोजी जाहीर केलेल्या प्रकटनाद्वारे कन्नड तालुक्यातील साधारणता 22 गावातील एकूण 14 हजार 644 हेक्टर जमिनीवर वनोत्तर कामांना बंदी घालण्यात आली. या अभयारण्यात कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यातील सुमारे 261.34 चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश करण्यात आला व्यवस्थापनाच्या दृष्टीने कन्नड वनपरिक्षेत्र, चाळीसगाव पाटणा वनपरिक्षेत्र, नागद वनपरिक्षेत्र असे भाग कल्पून त्यांची विभागणी हिवरखेडा परिमंडळ, तपोवन परिमंडळ, कन्नड परिमंडळ, उपळा परिमंडळ , अशी करण्यात आली. त्यातही साधारणतः 90 ते 100 उपविभाग ज्यांना बीट असं म्हटलं जातं ते कल्पिले आहेत .कन्नड हिवरखेडा परिमंडळात केवळ सीतान्हाणी पर्यंतचा भाग येतो . हे सारं वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व सोयगाव तालुका परिसरात आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका परिसरात लांब लांब चिंचोळ्या अशा पट्ट्यात पसरलेले आहे . महाराष्ट्रातील नावाजलेल्या जंगलांपैकी हे महत्त्वाचे अभयारण्य. या अभयारण्यात मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशी 35 ते 40 पानवठे वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर त्या गेटवरच उजव्या बाजूला गवता अभयारण्याचं माहिती केंद्र आहे. माहिती केंद्राचा पर्यटकांनी निश्चितच असा फायदा घ्यावा व पुढे अभयारण्यात प्रवेश करावा. दाट अशा झाडीतून गेलेला वळणावळणाचा हा रस्ता. चढ उतार करीत आपण एका नाल्यावर पोहोचतो त्याला चंदन नाला असं नाव. या नाल्याच्या आजूबाजूला दाट झाडीत करवंदाच्या जाळ्यांसोबत उंच सागाच्या लाकडा सोबत चंदनाची ही झाड आहेत अर्थात त्यामुळे या अभयारण्यात चंदन तस्करांचाही प्रवेश होतो. याच नाल्याच्या डाव्या बाजूला उंच असं लोखंडी मचान केलेला आहे त्या बाजूला सिमेंट बंधारा आहे. समोर पाणी, दाट झाडी, विविध पक्षांचे आवाज मोरांचे आवाज झाडावर उड्या मारणारी माकड आणि पाण्यावर तलवा काठी दिसणारे वन्यजीव हे मचिनावरून आपल्याला निरीक्षण करता येतं. थोडं पुढे वाहन गेला आपलं की डाव्या बाजूला आपोआप नारळ फुटणारा एक मारुती सुद्धा प्रसिद्ध आहे तो रोहि तलाव या परिसरात आहे अर्थात ही सारी जुन्या काळाची मानवी वसाहतीची अवशेष. पुढे हा रस्ता मध्यवर्ती अशा गवताळाच्या उंच माळरानावर नेतो. वाटेवर







ठिकठिकाणी मनोरे, लोखंडी रेलिंग छत्र्या आवरण्य खात्याने उभ्या केलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे बाग आणि खाली जमिनीवर गट्टू बसवून त्यांना रंगरंगोटी केलेली आहे. डाव्या बाजूला मारुती मंदिर आणि उजव्या बाजूला दर्गा त्यासमोर पुरातन असा मोठा तलाव समोर उंच टेकडी जी गौतम ऋषि आश्रम म्हणून ओळखली जाते त्या टेकडीवर जायला काही पायऱ्या केल्या आहेत. या दर्गासमोरच्या तलावात वन्यप्राणी रात्रंदिवस पाणी पिण्यासाठी येत असतात बाजूलाच मचान उभारले आहे. हा जुना तलाव उभारताना दगडाचे चिरे काढून त्याचे पायऱ्या म्हणून चारही बाजूला लावलेले आहेत. या परिसरात भरपूर अशी बोराची झाड चिंचेची झाड आवळ्याचे झाड आढळतात करवंद्याच्या जाळ्या सगळीकडे विपुल आहेत. उंच टेकडीवर आपण सोडून गेला तर तेथे गौतम ऋषी आश्रम हा पुरातन असला तरी त्याचा बरचस नूतनीकरण झालेला आहे. येथे पाच सहा पाण्याची टाकी खडकात कोरलेली दिसतात या गौतम ऋषी आश्रमाच्या वर डोंगरावर चढून गेला तर शेवटच्या टोकाला बुरुज आणि मध्यभागी काही इमारतीच्या बांधकामाच्या पायाच्या खुणा आढळतात शेवटच्या टोकावरील बुरुजावरून पाहिल्यास उत्तरेकडे खाली सीता न्हाणी म्हणून ओळखला जाणारऺ जुना हेमाडपंथी मंदिर आणि पुढचा एक बुरुज दिसतो. गौतम ऋषी आश्रमात असलेल्या जुन्या मुर्त्या ऐवजी आता नव्या मुर्त्या कालांतराने बसविण्यात आले आहेत. गौतम ऋषी सोबतच इथेही देवतांच्या मुर्त्या बसवल्या गेल्या आहेत. डोंगराने सरळ पुढे खाली उतरून आपणाला सीता न्हाणी या हेमाडपंथी मंदिरा जवळ पोहोचता येते. छान असं कोरीव काम असलेले हे मंदिर. लोक याला सीता न्हाणी म्हणतात. आज दोन दगडी रांजण आहेत बाहेरून पाणी टाकल्यानंतर ते राजनात येण्यासाठी दगडी नहर आहे. खामाऺवर कोरीव काम आहे. अर्थात ही वाटेवरची पानपोयी व विश्रांतीची जागा असावी. या वास्तू समोर संपूर्ण डोंगर उतरून खालपर्यंत खडक करून तीस फूट लांबीच्या व सात फूट रुंदीच्या अशा पायऱ्या कोरलेल्या आहेत शेवटच्या टोकाला एक बुरुज आहे या मंदिरासमोर खाली उतरताना वरच्या बाजूला एक बुरुज आहे. तिन्ही बुरुज सरळ रेषेत वाटेवरच्या टिळणीसाठी असावीत. या बुरुजावर चढण्यासाठी आतून पायऱ्या केलेल्या होत्या तळाचा बुरुज अजून आहे मात्र वरचे दोन बुरुज उध्वस्त केले गेले आहेत.












कन्नड पासून सतरा अठरा किलोमीटर गेल्यानंतर आपणाला नागदकडे जाणारा आणि रामपूरवाडी कडे जाणारा रस्ता दिसतो. आधी नागद कडे जाणाऱ्या रस्त्याने जाऊन थोड्या अंतरावर असलेला उंच टेकडीवरील सनसेट पॉईंट दिवसभर पाहण्यात जोगा आहे. खाली पाण्याचे बंधारे गावाच्या वस्त्या आणि खांलचा खानदेश परिसर या उंचावरून दिसतो , समोरच्या डोंगराच्या हिरवाईने नटलेल्या रांगा मन मोहून टाकतात. हा परिसर पाहिल्यानंतर पुढे पुरणवाडी रस्त्याला विरुद्ध दिशेने एखादा किलोमीटर जावयाचे आहे. तेथे अभयारण्याची डाॅरमेंटरी, गेस्ट हाउस, माहिती केंद्र आणि सीता खोरी नावाचा व्ह्यू पॉईंट , व






पुढे सीता खोरी धबधबा आहे. येथे गेस्ट हाऊस किंवा डार्मेटरी मात्र पर्यटकांना, थांबणाऱ्यांसाठी नाही. त्याचे बुकिंग ही औरंगाबाद ही केलं जात नाही. वनाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि त्यांची मित्र मंडळ यांच्यासाठीच ते वापरले जाते असा माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. या ठिकाणी वरून कोसळणारा धबधबा सिताखोरी परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वन खात्याने डोंगरकडेला रेलिंग केलेले आहे. या परिसरात दुर्मिळ अशा वनस्पती आजही आहेत. खूप खोल अशा या दरीत बिबट वाघ सारखे प्राणी यांचा वावर यामुळे या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप नसल्यामुळे जैवविविधता जोपासली गेली आहे. या खोल दरीत उंचावर आलेले सुळके हे गौताळा अभयारण्याचं भूषण आहे, ते सर्वत्र प्रतीक म्हणून वापरले जात आहे. याच परिसरात थोड पुढे रामपूर वाडी गेटकडे लागून काही क्षेत्र हे राखीव केले असून त्या परिसरात वावरण्यासाठी मज्जाव केलेला आहे हे क्षेत्र संशोधनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या गौताळा अभयारण्यात विविध प्राणी पशुपक्षी फुलपाखरे कीटक साप आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या प्रकारचे गवत आढळतात , जोपासले जातात, त्यांना संरक्षण दिलं जातं.

सीताखोरी परिसर पाहून आपण रामपूर वाडीकडे गेटच्या बाहेर पडू. या रस्त्याने आपण जर पुढे गेलो तर मेहून चे अलीकडे आपल्याला पानदेव हे तीर्थक्षेत्र मिळते .असं म्हटलं जातं की पानदेव हा पर्जन्य देणारा असा देव. अक्षय तृतीयेला सिताखोरी या खोल दरीतून मध्यरात्री पाणी आणून या पानदेवाला वाहिले जाते. पांडव म्हणजे इथे पांडुरंग दिलेला ओठा एक भिंत आणि समोर एक स्तंभ एवढेच आहे .कुठलीही मूर्ती नाही किंवा कुठलीही आकृती नाही. निर्गुण निराकार असा हा देव. परिसरातील लोक असे समजतात की हा देव केवळ महार या जातीच्या लोकांचा देव आहे. मात्र या जंगलातील हा पान देव पर्जन्य देवता असल्याने तो सर्वांचा देव असावा. अक्षय तृतीयेला केवळ परिसरातील महार लोक या सिताखोरीत खोलदरीत जाऊन व अवघड असा डोंगर चढून पाणी आणतात व ते या देवाला वाहतात म्हणून कदाचित त्यांचा देव असा शिक्का मारला गेला असावा.





पर्यटकांना कन्नड मुक्कामी आल्यानंतर एका दिवसात पितळखोरा कालीमठ हे पाहणं होतं तर दुसऱ्या दिवशी हा गौताळाचा परिसर पाहून होतो. गवताळा परिसर पाहिल्यानंतर आपण पुढचं पर्यटन हे केलेअंतूरचा करूया हे पाहूया आपल्या या लेखाच्या तिसऱ्या भागात.


डॉ. रमेश सूर्यवंशी,

अभ्यासिका,

वाणी मंगल कार्यालयासमोर,

हिवरखेडा रोड, कन्नड

जिल्हा औरंगाबाद

महाराष्ट्र

संपर्क 84 46 43 22 18


61 views0 comments

Recent Posts

See All

आई आणि मुलगी, तेव्हा आणि आता

लघुकथा म्हणण्यापेक्षा एक छोटासा अनुभव. शिकत असताना किंवा नोकरीवर असताना आई काही काही बांधून द्यायची. खायला लाडूच ने, चिवडा ने, चटणी ने असऺ किंवा नोकरी असताना मग डाळ घेऊन जा. ज्वारी घेऊन जा. गहू घेऊन ज

bottom of page